ग्राहक म्हणून आपले काय हक्क आहेत याविषयी माहिती जाणून घेऊयात.
ग्राहकांनी चोखंदळ आणि चिकित्सक असायला हवं जेणेकरून आपली कुणीही फसगत करणार नाही.
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला ग्राहक म्हणून 6 हक्क मिळाले आहेत. त्यांची माहिती असल्यास आपली फसवणूक होणार नाही.
1) सुरक्षेचा हक्क.
आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य असतं.
आपण ज्या वस्तू विकत घेतो त्याची उपयुक्तता हाच एकमेव निकष नाही तर त्या वस्तू सुरक्षितही असाव्यात. इलेक्ट्रिकल उत्पादनं घेताना ही काळजी घेणं आवश्यक आहे.
वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसेच, त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी शक्यतो आयएसआय आणि अॅगमार्कचं चिन्ह असलेल्या वस्तूच विकत घ्याव्यात.
या वस्तूंच्या वापरामुळे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झालं तर कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागते.
2) माहितीचा हक्क.
एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणे हा ग्राहकांचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे.
एखादं उत्पादन किंवा सेवा घेण्यापूर्वी त्या संदर्भातली पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही.
सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार आहे.
3) निवड करण्याचा अधिकार.
आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच ब्रॅंडच्या वस्तू दुकानदार विकत घेण्यास सांगत असेल तर लक्षात घ्या की, हे तुमच्या हक्कांचे उल्लंघन आहे. (अपवाद फक्त विशिष्ट ब्रॅंडच्या आउटलेटचा.)
समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही शीतपेय मागितले. पण वेटरनं म्हटले की या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच कंपनीचे शीतपेय मिळेल, तर हे तुमच्या हक्कांविरोधात आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचा ग्राहकांना अधिकार आहे.
4) तुमचं म्हणणे मांडण्याचा हक्क.
जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे, तर तुम्हाला तुमचे म्हणणे योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे.
ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सरकारने तक्रार निवारण केंद्र आणि ग्राहक न्यायालयांची स्थापना केली आहे.
इतकंच नाही तर ग्राहक त्यांच म्हणणं सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी ग्राहक मंचाची स्थापना करू शकतात.
या ग्राहक मंचाचे शिष्टमंडळ आपले म्हणणे सरकारकडे मांडू शकते. सरकार त्यांच्या सूचना आणि शिफारशींवर विचार करते.
5) तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क.
जर ग्राहकाची फसगत झाली असेल, तर त्याला तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे. जर तक्रार रास्त असेल तर तिचं निवारण होईल असा हक्क कायद्याने ग्राहकाला दिला आहे.
कधीकधी एखादी तक्रार लहान असू शकते, पण तरी देखील त्याविरोधात दाद मागता येऊ शकते.
6) ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार.
अनेकदा ग्राहक हक्क शिक्षणाच्या अभावामुळे ग्राहकांची फसवणूक होते, असे दिसून येते.
ग्राहकांनी आपले हक्क काय आहेत, हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, तसंच स्वयंसेवी संस्था शिबिरं किंवा कार्यशाळा घेत असतात.
"ग्राहक शिक्षणावर सगळ्यात जास्त भर असायला पाहिजे. जेणेकरून प्रत्येक ग्राहक सक्षम होईल."
ग्राहकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य!
ग्राहकांना केवळ हक्कच आहेत असे नाही, तर त्यांच्या काही जबाबदाऱ्या आणि काही कर्तव्ये देखील आहेत याची जाणीव देखील त्यांना असायला हवी.
ग्राहकांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, एगमार्क आणि ISO प्रमाणित उत्पादनं विकत घ्यावीत. "प्रमाणित केलेली उत्पादने सुरक्षेची एकप्रकारे हमी देतात, म्हणून ती घेणं योग्य ठरते".
टीप: वरील सर्व छायाचित्र प्रतिनिधीक स्वरूपाची आहेत.
ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रार निवारण केंद्र आहेत.
पण आपल्या जागरूकतेमुळे प्रशासकीय यंत्रणेवरील तणाव कमी होऊ शकतो आणि सर्वांचा वेळ वाचू शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा